चेन्नई: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजयने (Vijay) तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी अभिनंदन केले नव्हते आणि ते विजयवर जळतात, अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अखेर या सर्व चर्चांवर आणि अफवांवर मौन सोडत सुपरस्टार रजनीकांत यांनी चेन्नईतील आपल्या निवासस्थानी एक तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि यावर जाहीर स्पष्टीकरण दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना रजनीकांत म्हणाले, “जेव्हा मला पहिल्यांदा समजलं की विजय मुख्यमंत्री झाला आहे, तेव्हा मला प्रचंड धक्का बसला होता (I was extremely shocked). पण तो धक्का आनंदाचा आणि आश्चर्याचा होता. मी राजकारणात नाही, मी खूप वर्षांपूर्वीच राजकारण सोडलं आहे. त्यामुळे मी विजयवर जळावे असं काहीच कारण नाही.”
रजनीकांत यांनी विजयच्या या ऐतिहासिक विजयाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “विजय आणि माझ्यात २५ ते २८ वर्षांचे जनरेशन गॅप (वयाचे अंतर) आहे. आमच्यात कसलीही स्पर्धा नाही. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी विजयने जे यश मिळवले आहे, ते एमजीआर (MGR) आणि एनटीआर (NTR) यांच्यापेक्षाही मोठे आहे. केंद्रामध्ये सत्ता असलेल्या भाजप आणि राज्यातील दोन बलाढ्य द्रविडीयन पक्षांसोबत (DMK आणि AIADMK) एकट्याने लढा देऊन विजयने हे यश मिळवले आहे. मला त्याचा अत्यंत अभिमान आणि आनंद आहे.”
निवडणूक निकालानंतर रजनीकांत यांनी माजी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांची भेट घेतली होती. त्यावरही टीका झाली होती की रजनीकांत हे विजयला मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी स्टालिन यांना भेटले. यावर स्पष्टीकरण देताना रजनीकांत संतापले आणि म्हणाले, “रजनीकांत हा इतका स्वस्त किंवा खालच्या पातळीचा माणूस नाही की तो कोणाबद्दलही अशी चर्चा करेल. स्टालिन आणि माझी मैत्री गेली ४० वर्षे आहे. आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. निवडणुकीत हार-जीत होतच असते. स्टालिन यांचा पराभव झाल्याने मला मित्र म्हणून वाईट वाटले, म्हणून मी त्यांची भेट घेतली. जर मी आज पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिले नसते, तर लोकांनी त्याच खोट्या अफवांना सत्य मानले असते.”
एअरपोर्टवर पत्रकारांनी विजयच्या मुख्यमंत्री होण्यावर प्रश्न विचारला असता रजनीकांत यांनी केवळ हात जोडून स्मितहास्य केले होते, त्यावरही वाद निर्माण झाला होता. त्यावर बोलताना रजनीकांत म्हणाले, “असं म्हटलं गेलं की मी एअरपोर्टवर विजयचे अभिनंदन केले नाही. पण विजयचा विजय निश्चित होताच मी सर्वात आधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट लिहून त्याचे आणि त्याच्या पक्षाचे अभिनंदन केले होते. कदाचित कमल हासन मुख्यमंत्री झाले असते तर मला हेवा वाटला असता (हसत), पण विजय तर माझ्या मुलासारखा आहे.” शेवटी, “निवडणुकीत कोणाच्या नशिबात काय लिहिले आहे ते घडतेच. विजयकडून तामिळनाडूच्या जनतेला खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि तो त्या नक्कीच पूर्ण करेल, असा मला विश्वास आहे,” अशा शब्दांत रजनीकांत यांनी मुख्यमंत्री थलपथी विजय यांना आपल्या शुभेच्छा दिल्या.
















