मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडली आहे. आरक्षणाबाबत माझी मतं फार पराकोटीची आहेत, असे ते म्हणाले.
आरक्षणाविषयी तुमचे काय मत आहे, असा प्रश्न विचारल्यावर नाना म्हणाले, ‘‘मला माहीत नाही. आरक्षणासंदर्भात मी टिप्पणी करू नये. आरक्षणाबाबत माझी मतं फार पराकोटीची आहेत. मी काही बोललो तर पुन्हा उद्या त्यावरून बोंबाबोंब होईल.’’ यावेळी नानांनी
राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नाचंही उत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करण्याविषयीची चर्चा होती. याविषयी बोलताना नाना म्हणाले, ‘राजकारण हा माझा प्रांत नाही. मी तिथे जराही टिकू शकणार नाही. माधुरी दीक्षितचं मला माहीत नाही पण त्या क्षेत्रात मी टिकू शकणार नाही. तुम्ही बाहेर असल्याने तुमची मतं मांडता येतात. तिथे गेल्यानंतर तुमच्या मताला कितपत किंमत असेल मला माहीत नाही.’
राजकारण या विषयावर बोलताना नाना पाटेकरांनी भाजपविषयी मोकळेपण मत मांडले आहे. आपण राजकारणाविषयी याठिकाणी बोलू नये, ते एवढ्यासाठी की मग मी फार परखडपणे बोलेन. त्यावरून पुन्हा कॉन्ट्रोव्हर्सी होईल. मी कुठल्याही पक्षाचा नाही. माझे वडील कट्टर काँग्रेसवादी होते, मी कट्टर शिवसेनेचा होतो.
आज मला भाजप खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते. मला नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा आमचे देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करतात, ते मला आवडते. ज्या पद्धतीने नितीन गडकरी काम करतात, ते मला आवडते. कोण काय बोलेल याच्याशी काही घेणेदेणे नसते. आपल्याला आपले काम अतिशय इमानाने करता आले पाहिजे. गडकरी याचे मोठे उदाहरण आहेत. तो माणूस अजातशत्रू आहे. विरोधी पक्षातील मंडळी, त्यांच्या पक्षातली मंडळी.. सगयांनाच ते हवेहवेसे वाटतात. जो कोणी छान काम करतो, त्याला नमस्कार करायचा. फक्त त्याच्याकडे स्वत:साठी वैयक्तिकरीत्या काही मागायचं नाही. मग तुमची मैत्री टिकून राहते, असे ते पुढे म्हणाले.