हैदराबाद : वृत्तसंस्था
नोटबंदी केल्यानंतरही देशातील भ्रष्टाचाराला लगाम लागल्याची स्थिती नाही. उलट त्यात वाढच होत असल्याचे नवीन सर्व्हेमधून दिसत आहे. अशातच देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोठे मूल्य असलेल्या नोटा बंद करण्याचा भूमिका मांडली आहे. भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर ५०० रुपयांची नोट बंद करायला पाहिजे, असे चंद्राबाबू नायडू म्हणाले.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, सर्व जास्त मूल्य असलेल्या नोटा बंद करायला हव्या. तेव्हाच भ्रष्टाचार संपवता येईल. १०० आणि २०० रुपयांपेक्षा कमी मूल्य असलेल्या नोटाच चलनामध्ये असल्या पाहिजेत. ५०० रुपयाच्या नोटेची गरज नाही, असा सल्ला त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी दिला.
सरकारच्या मोफत लाभाच्या योजनाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला चंद्राबाबू नायडूंनी उत्तर दिले. ते म्हणाले, फ्रीबीज हा योग्य शब्द नाहीये. पूर्वी जास्त कल्याणकारी योजना नव्हत्या. पण, माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांनी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या.
जातिनिहाय जनगणना करण्याच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी महत्त्वाचे भाष्य केले. प्रत्येक नागरिकाची जातिनिहाय जनगणना तर केलीच पाहिजे. त्याचसोबत कौशल्य आधारित आणि आर्थिक स्थितीबद्दलही जनगणना केली पाहिजे. आजच्या काळात माहिती खूप शक्तीशाली बनली आहे. त्यातून सार्वजनिक धोरणे अधिक चांगल्या प्रकारे लागू केली केली जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.