28.2 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeराष्ट्रीयभारतीय वस्तू ४० ऐवजी २४ दिवसांत रशियात पोहोचतील

भारतीय वस्तू ४० ऐवजी २४ दिवसांत रशियात पोहोचतील

मोदी-पुतिन यांच्या करारामुळे ६००० किमीची बचत

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये चेन्नई-व्लादिवोस्तोक ईस्टर्न कॉरिडॉरबाबत चर्चा झाली. हा कॉरिडॉर फक्त १०,३७० किमी लांब असेल, ज्यामुळे भारतीय जहाजे सरासरी २४ दिवसांत रशियाला पोहोचू शकतील.

सध्या भारताकडून रशियाच्या सेंट पीटर्सबर्गपर्यंत माल पाठवण्यासाठी जहाजांना सुमारे १६,०६० किमीचा लांब प्रवास करावा लागतो, ज्याला सुमारे ४० दिवस लागतात. म्हणजेच हा नवीन मार्ग सुमारे ५,७०० किमी लहान आहे आणि भारताला थेट १६ दिवसांची बचत होईल. पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ५ डिसेंबर रोजी झालेल्या चर्चेत हा सागरी मार्ग लवकर सुरू करण्यावर सहमती झाली. जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा नवीन मार्ग एक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह पर्याय देऊ शकतो असे मानले जात आहे. मोदी आणि पुतिन यांच्यातील बैठकीत भारत आणि रशियाचा परस्पर व्यापार २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये सुमारे ६० अब्ज डॉलरचा व्यापार होतो.

भारत-रशिया पारंपरिक मार्ग १६,०६० किमी लांब मुंबईहून स्वेज कालव्यातून सेंट पीटर्सबर्गपर्यंत जाणारा हा पारंपरिक मार्ग १६,०६० किमी लांब आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे हा मार्ग आज सर्वात धोकादायक, लांब आणि महागडा मानला जात आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण व्यापार कॉरिडॉर ७,२०० किमी लांब आहे. हा मुंबईहून इराण, अझरबैजानमार्गे रशियातील वोल्गोग्राडपर्यंत जातो. ७,२०० किमी लांब मल्टी-मॉडल कॉरिडॉर मालवाहतुकीचा वेळ कमी करून २५-३० दिवसांवर आणतो. हा पारंपरिक मार्गापेक्षा स्वस्त आहे, परंतु येथे इराणमुळे तणाव कायम असतो.

भारतासाठी गेमचेंजर ठरेल नवीन कॉरिडॉर
या कॉरिडॉरमुळे चेन्नई ते मलाक्का खाडी, दक्षिण चीन समुद्र आणि जपान समुद्रातून व्लादिवोस्तोकपर्यंत जाणा-या प्रवासाचे १६ दिवस वाचतील. हा मार्ग सुरक्षित असण्यासोबतच येत्या काळात भारत-रशिया व्यापारासाठी गेमचेंजर ठरू शकतो. तज्ज्ञांचे मत आहे की हा कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने सुरू होईल. तो सुरू होताच तेल, वायू, कोळसा, यंत्रसामग्री आणि धातू यांसारख्या महत्त्वाच्या व्यापार क्षेत्रांना गती मिळेल आणि भारताची पुरवठा साखळी खूप मजबूत होईल. हा मार्ग भारत-रशिया आर्थिक भागीदारीला नवीन उंची देईल. गाझा युद्धामुळे सुएझ कालवा मार्गावरील वाढता धोका आणि युक्रेन युद्धामुळे युरोपमार्गे रशियापर्यंत पोहोचणा-या पारंपरिक सागरी मार्गात सतत अडचणी येत आहेत.

कच्च्या मालाचा पुरवठा सहज होईल
चेन्नई-व्लादिवोस्तोक ईस्टर्न कॉरिडोर सुरू होताच रशियाकडून भारताला कच्चे तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, खते, धातू आणि इतर औद्योगिक वस्तू आयात करणे सोपे होईल. यामुळे भारताच्या ऊर्जा आणि कच्च्या मालाच्या गरजा सुरक्षित राहतील. भारत रशियाला यंत्रसामग्री, अभियांत्रिकी वस्तू, ऑटो-पार्ट्स, वस्त्रोद्योग, कृषी आणि सागरी उत्पादने पाठवू शकतो. सागरी वस्तू आणि यंत्रसामग्रीवर भर देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR