पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतील श्लॉस एलमाऊ येथे झालेल्या जी-7 शिखर परिषदेत भाग घेतला. दरम्यान परिषद सुरू होण्यापूर्वी पीएम नरेंद्र मोदींनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राला संबोधित देखील केले. आपल्या भाषणा दरम्यान पंतप्रधान मोदींनी गरीब देश पर्यावरणाचे जास्त नुकसान करतात हा गैरसमज आहे, असे खडे बोल अन्य जागतिक देशांना सुनावले.
जी-7 शिखर परिषदेचे पहिले सत्र हवामान बदल, ऊर्जा आणि आरोग्याशी संबंधित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा १००० वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास या गैरसमज किंवा दृष्टिकोनाचे पूर्णपणे खंडन करतो. भारताने पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी कधीही कमी पडू दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील १७ टक्के लोकसंख्या भारतात राहते, मात्र जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचे योगदान केवळ ५ टक्के आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आमची जीवनशैली.
पीए मोदी म्हणाले की, ऊर्जा ही केवळ श्रीमंतांचा विशेषाधिकार नसावा, तर एका गरीब कुटुंबाचाही उर्जेवर समान अधिकार असतो. आम्ही भारतात घरोघरी एलईडी बल्ब आणि स्वच्छ स्वयंपाकाचा गॅस पोहोचवला आहे आणि गरिबांसाठी देखील उर्जेचे पर्याय उपलब्ध करत अनेक दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन टाळता येऊ शकते हे दाखवून दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या कामगिरीवरून हवामान बदलांप्रती आमची बांधिलकी स्पष्ट होते. ९ वर्षांपूर्वी आम्ही ४० टक्के ऊर्जा क्षमतेचे लक्ष््य गाठले होते. यासह, आम्ही पाच महिने आधीच पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष््य गाठले आहे. पीएम मोदींनी सांगितले की, भारतात जगातील पहिले पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे विमानतळ आहे. तसेच भारताची विशाल रेल्वे व्यवस्था या दशकात नेट झिरो टारगेट गाठेल. तसेच आम्हाला आशा आहे की, जी-7 मधील समृद्ध देश भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देतील असेही मोदी म्हणाले.