Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय?

अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय?

रात्री उशिरा आमदारांची सुनेत्रा पवारांशी खलबतं

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वीसहून अधिक आमदार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी एकत्र आले होते. या बैठकीत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणाभोवती संशयाचे वलय अधिकच गडद होताना दिसत आहे. अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीकडे जात असताना विमान कोसळले आणि झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला.

नागरी उड्डाण संचालनालय म्हणजेच डीजीसीएने सादर केलेल्या अहवालाबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याचे आमदारांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक सखोल तपास व्हावा, अशी भावना आमदारांनी व्यक्त केली. या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यांनी व्हीएसआर कंपनी आणि नागरी उड्डाण संचालनालय यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. विमान दुर्घटनेत काही संशयास्पद बाबी असल्याचे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ‘देवगिरी’ बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि या सर्व मुद्यांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून म्हणजेच सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशी मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिले होते. या मागणीबाबत पुढे काय झाले, याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विचारणा करावी, असे आमदारांनी बैठकीत सुचवले. त्यावर सुनेत्रा पवार यांनी लवकरच सर्वजण मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करू, असे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे.

प्रत्येक आमदाराशी सुनेत्रा पवार यांचा स्वतंत्रपणे संवाद
या बैठकीत डीजीसीएच्या अहवालातील काही मुद्यांवरही चर्चा झाली. अहवालामध्ये अनेक त्रुटी असल्याचे काही आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. या संदर्भात अनेक प्रश्न आणि शंका त्यांनी व्यक्त केल्या. ‘देवगिरी’ बंगल्यावर आलेल्या प्रत्येक आमदाराशी सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्रपणे संवाद साधल्याचीही माहिती मिळत आहे. या चर्चेत नेमके कोणते मुद्दे मांडले गेले, याचा तपशील मात्र अद्याप समोर आलेला नाही.

अपघातानंतर मिळालेल्या वस्तू आमदारांना दाखवल्या
बैठकीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेल्या काही वस्तू आमदारांना दाखवल्याचेही समजते. यामध्ये अजित पवार यांची चप्पल आणि घड्याळ यांचा समावेश होता. या वस्तू पाहिल्यानंतर आमदारांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. या अनुषंगानेही काही मुद्यांवर चर्चा झाली. त्यामुळे ‘देवगिरी’ बंगल्यावर झालेली ही बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत पुढील घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR