रत्नागिरी : रत्नागिरीतल्या समुद्र किना-यांवर मोठ्या संख्येने जेली फिश आढळून आले आहेत. वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश किनारी भागाकडे फेकल्या गेल्या आहेत. या जेली फिश जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आयाळाप्रमाणे असल्याने त्यांना लायन्स मेन असे देखील म्हटले जात आहे. दरम्यान किना-याच्या वाळूत रूतल्याने हजारो जेलीफिशचा मृत्यू झाला आहे. जेली फिश प्रचंड विषारी असतात, त्यांचा अंगाला स्पर्श होताच तीव्र वेदना होते, त्यामुळे या माशांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. साधारणपणे समृद्रात २० ते २५ वाव खोल हे जेली फिश आढळून येतात, ते कधीकधी समुद्राच्या पुष्ठ भागावर देखील तरंगतात.
मोठ्या संख्येने जेली फिश समुद्राच्या किना-यावर आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरे वारे, गणपतीपुळे, माडबन, सागरीनाटे, आंबोळगड, गावखडी, भाट्ये, आरेवारे, मालगुंड या किना-यांवर मोठ्या प्रमाणात जेली फिश आढळून आले आहेत, त्यामुळे नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे आज देखील कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सलग सातव्या दिवशी आज जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे, पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले आहे, पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्यामुळे पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किनारपट्टी भागांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. समुद्रामध्ये उचं लाटा उसळत असल्यामुळे सध्या मासेमारी ठप्प आहे, आज कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

