जळकोट : तालुक्यातील कोळनुर, करंजी, माळहिप्परगा, पाटोदा बुद्रुक, पाटोदा खुर्द , तिरुका , करंजी, सोनवळा, लाळी बुद्रुक, लाळी खुर्द , येवरी , डोंगर कोनाळी , जंगमवाडी , डोंगरगाव ,मरसांगवी, मंगरूळ, बोरगाव, एकुर्का, धनगरवाडी, विराळ, यासह अनेक गावे पाच दिवसांपासून अंधारात होते. यामुळे प्रचंड अडचणीचा सामना तालुक्यातील अर्ध्या गावातील नागरिकांना करावा लागला. याबाबत जळकोट तालुक्यातील विविध कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे वीजपुरवठ्यासंदर्भात लक्ष घालावे अशी मागणी केली होती त्यानुसार त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधून सूचना करताच यंत्रणेने कार्यवाही सुरू केली असून आज वीज पुरठवा सुरळीत होणार आहे.
कोळनूर सबस्टेशनमध्ये नवीन ट्रांसफार्मर आले असून आज सायंकाळपर्यंत जळकोट तालुक्यातील अर्ध्या गावांचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही जळकोट तालुक्यातील नागरिकांची होणारी अडचण दूर व्हावी यासाठी ऊर्जा खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत संपर्क साधला होता. माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी देखील पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे तात्काळ नवीन ट्रांसफार्मर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली होती.
जळकोट शाखा अभियंता कार्यालयातील तसेच उदगीर विभागीय कार्यालयातील महावितरणच्या अधिकारी तसेच कर्मचा-यांंनी जळकोट तालुक्यातील या २७ गावांना जवळ असलेल्या सब स्टेशनमधून सिंगल फेज वीज पुरवठा सुरू केला आहे परंतु पाणीपुरवठ्याच्या मोटारी मात्र सुरू होत नाही. यामुळे अनेक गावांना अद्यापी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे परंतु आज वीजपुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या मोटारी लवकरच सुरू होणार आहेत .