औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत मारुती महाराज साखर कारखान्याने यावर्षी गळीत हंगामात उत्पादन केलेली साखर मंगळवार दि. ३० नोव्हेंबर रोजी बाहेर पडली त्यामुळे औसा तालुका व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून मांजरा परिवाराने दिलेल्या शब्दाची पूर्ती झाल्याचे समाधान व्यक्त होत आहे
गेल्या ७ वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना यावर्षी सुरू झाला आणि तात्काळ साखरेचे उत्पादन सुरू झाल्याने परिसरातून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जात आहे. तीन दिवसापूर्वीच २७ नोव्हेंबर रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकुन गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानुसार २८ नोव्हेंबरला प्रत्यक्ष गाळप सुरू झाले. पहिल्या दिवशी ७७० मेट्रिक टन क्रॅशिंग झाले तर दुस-या दिवशी ९०० मेट्रिक टन गाळप झाले आहे. अवघ्या तीन दिवसापूर्वी चिमणी पेटली मंगळवारी उत्पादन केलेली साखर बाहेर पडली आहे. पहील्या पोत्याचे पूजन संत मारुती महाराज यांच्या मूर्ती समोर ठेवून नारळ फोडण्यात आले, महाराजांचे आशीर्वाद घेतले.
राज्याचे माजी मंत्री मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, व्हॉईस चेअरमन शाम भोसले, संचालक मंडळ यांच्या सूचनेनुसार संत मारुती महाराज साखर कारखान्याचा यावर्षी गळीत हंगाम सुरू करण्यात आला असून कारखाना परिसरात अंदाजे एकूण पाच लाख मेट्रिक टन ऊस असून त्यापैकी सभासदांचा अंदाजित तिन लाख मेट्रिक टन ऊस आहे तर बिगर सभासदांचा दोन लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. कारखाना अंदाजित तीन लाख टन उस गाळप करणार असल्याची माहिती मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, व्हाइस चेअरमन शाम भोसले, सरव्यवस्थापक दत्ता शिंदे यांनी दिली.
यावेळी मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील, प्रदीप चव्हान, सुरेश पवार, चीफ इंजिनिअर पवार, चीफ केमिस्ट बालकुंदे, चीफ अकाँटंट चव्हाण, शेतकी अधिकारी शिंदे, अधीक्षक सावंत, उस पुरवठा अधिकारी घोंगडे आदी उपस्थित होते.