शिरुर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यात विजांचा कडकडाट आणि आणि वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे फळबागा आणि उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. यात उजेड लगतच्या ढोबळेवाडी येथील गोपाळ वाघमोडे यांच्या बैल जोडीवर वीज पडल्याने दोन्ही बैल जागीच दगावले असून ऐन पेरणीपूर्वी ही दुर्घटना घडल्याने शेतक-यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता. यात दुपारी चार वाजता वाजता अचानक आकाशात काळे ढग जमले व विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस सुरु झाला. या वादळी वा-यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर पावसाने भाजीपाल्याचे ही मोठे नुकसान झाले आहे.
या पावसाने कडक उन्हात थोडासा दिलासा मिळाला असला तरी या वादळी पावसाने आंबा, भाजीपाला व उन्हाळी सोयाबीनचे नुकसान झाले आहे. या पावसाचा भाजीपाल्याली फटका बसल्याने अगोदरच भाजीपाल्याचे वाढलेले भाव आता गगनाला भिडणार आहेत, तर आंबा पिकाला पावसाचा मार लागल्याने आंबा पिकाची प्रतवारी खराब झाल्याने बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान उजेडलगत असलेल्या ढोबळेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी गोपाळ वाघमोडे यांनी आपली बैलजोडी शेतात बांधली होती. अचानक विजेच्या कडाकडाटासह आलेल्या वादळी पावसात वीज पडल्याने त्यांची बैलजोडी दगावली. त्यामुळे शेतकरी उघड्यावर आला असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.