31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeलातूरसोयाबीनवरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बियाणाचे वाण विकसित करा

सोयाबीनवरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बियाणाचे वाण विकसित करा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून गेल्या काही वर्षांपासून या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील शेतक-यांना बियाणे, खते वापर आणि लागवडविषयक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. तसेच लातूर जिल्ह्यासाठी सोयाबीनचे स्वतंत्र वाण विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज येथे दिल्या.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर मंदिर येथील विलासराव देशमुख यात्री निवास हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री सिद्धेश्वर कृषी महोत्सव २०२३ चे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आत्माचे संचालक दशरथ तांबाळे, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानचे प्रशासक सचिन जांबूतकर, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर. एस. पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी महेश क्षीरसागर यावेळी उपस्थिती होते.

सोयाबीन पिकावर येणा-या पिवळा मोझॅक, शंखी गोगलगायसारख्या दरवर्षी नवीन येणा-या रोगांमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने अशा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतक-यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यासाठी कृषि विभागाने मंडळनिहाय, गावनिहाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवून शेतक-यांना लागवड, बियाणे, खते याविषयीचे प्रशिक्षण द्यावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान जिल्ह्यातील शेतक-यांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. याठिकाणी मिळणा-या माहितीच्या आधारे शेतक-यांनी आपल्या पीक पद्धतीत बदल करावा. वैविध्यपूर्ण पिकांची लागवड करून एकाच पिकावरील अवलंबित्व कमी करावे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित जिल्ह्यातील बचतगटांच्या माध्यमातून तृणधान्यावर आधारित पदार्थांचे उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासोबतच प्रत्येक नागरिकाने आपल्या आहारात तृणधान्याचा समावेश करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

यावेळी आत्माचे संचालक तांबाळे, विभागीय कृषी सहसंचालक दिवेकर, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून शेतक-यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहायला मिळते. तसेच या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीमध्ये करण्याची प्रेरणाही मिळते. श्री सिद्धेश्वर कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान, शासनाच्या योजना, शेतक-यांच्या याशोगाथांची माहिती देण्यासाठी १८२ दालने उभारण्यात आली आहेत. तसेच पाचही दिवस विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या कृषी महोत्सवाला भेट देवून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहन प्रास्ताविकामध्ये गावसाने यांनी केले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तयार केलेल्या तीन घडीपुस्तिकांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले, आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर. एस. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या