लातूर : गेल्या ८ ते १० दिवसात झालेल्या संततधार पावसाने लातूर जिल्ह्यातील लहान, मोठे पूल क्षतीग्रस्त झाले असून कांही पूल वाहून गेले आहेत. तर सततच्या पावसामुळे रस्त्याला अवकळा येवून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तर पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्ते अनेक ठिकाणी वाहून गेले आहेत. संततधार पावसाने ग्रामीण भागातील दळणवळण यंत्राना कांही प्रमाणात कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या क्षतीग्रस्त पुलांची व रस्त्यांची दुरूस्ती केंव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाली आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या ८ ते १० दिवसामध्ये झालेल्या संततधार पावसामुळे पिकांच्या नुकसानीबरोबरच दळणवळणाचा कणा समजले जाणारे रस्ते, पुलही पुरामुळे कांही ठिकाणी वाहून गेले आहेत. तसेच नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठया प्रमाणात शेतक-यांच्या पिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात सरासरी ७९१.६० मिमी पाऊस पडतो. तो यावर्षी आज पर्यत ३८८.१ मिमी इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सतत पडलेल्या पावसामुळे लहान, मोठे पूल वाहून गेले आहेत. यात संततधार पावसामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बाकली ते बसपूर या इतर जिल्हा मार्गावरील मांजरा नदीच्या पुलालगत ३ ते ४ मिटर रस्ता खचला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक झाला आहे.
अहमदपूर तालुक्यातील मन्याड नदीवरील सुनेगाव-शेंद्री पुल, देवणी तालुक्यातील हिसामनगर-हेळंब रस्त्यावरील पुलाचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. कांही ठिकाणी पुलाच्या लगत टाकलेला भरावही वाहून गेला आहे. तसेच हाडोळती-सावरगाव रस्ताही खराब झाल्याने वाहतूक जवळपास बंद झाली आहे. अहमदपूर तालुक्यातील धसवाडी ते उध्दव तांडा रस्त्यावर जवळपास २०० ते ३०० मिटरचा नाला तयार झाला आहे. त्याचा दळणवळण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.