लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासकीय योजनांची जत्राचे आयोजन करायचे असून त्या दृष्टीने सर्व विभागाने तयारी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या सोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अमोल शिंदे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, नगर प्रशासन अधिकारी रामदास कोकरे,विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शासकीय योजनांची जत्रा या विशेष कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग सहभागी होणार असून यात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी अधिक-यांना जबाबदारीचे वाटप करण्यात येणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तालुकापातळीपर्यंत याचे नियोजन केले जाणार असल्याचेही यांनी यावेळी नमूद केले. लोक कल्याणाचे ध्येय समोर ठेवून शेवटच्या गरजू पर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचावा यासाठी शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार असून त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी राज्यात शासकीय योजनांची जत्रा हा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.