रेणापूर (दिलीप नगर) : रेणा सहकारी साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये गळीत झालेल्या ऊसाच्या एफआरपीपोटी तिस-या हप्त्याची अंतिम रक्कम रूपये ३०० प्रमाणे रेणा कारखान्याचे संस्थापक व मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, रेणाचे संचालक तथा आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी जाहीर केली आहे. गळीत हंगाम २०२१-२०२२ साठी रेणा कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात ऊसाची नोंंद झाली होती. अतिरिक्त ऊसाची मोठी समस्या उद्भवलेली असतानाही रेणा साखर कारखान्याने माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख व संचालकांच्या सूचनेनुसार व नियोजनातून संचालक मंडळ व सर्व अधिकारी कर्मचारी, ऊसतोड कामगार, वाहतूकदार यांच्या सहकार्याने सर्व ऊसाचे गाळप केले आहे.
रेणा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील एफआरपी पोटी पहिला हप्ता प्रती मे. टना प्रमाणे रूपये २२०० (बावीसशे) दुसरा हप्ता २०० (दोनशे) व तिसरा अंतिम हप्ता रू. ३०० अशा प्रकारे एकूण २७०० (दोन हजार सातशे) एवढी रक्कम अदा केली आहे. यानुसार यापुर्वी २४०० रूपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे १५३ कोटी, २८ लाख रक्कम अदा केली आहे. व सोमवारी ३०० रूपये प्रती में.टनाप्रमाणे १९ कोटी, १५ लाख एवढी रक्कम बँकेत वर्ग केली जात आहे. यानुसार चालू गळीत हंगामात एकूण १७२ कोटी ४४ लाख एवढी एकूण रक्कम ऊस पुरवठादार शेतक-यांना रेणा कारखान्याकडून अदा केली गेली आहे.
रेणा कारखान्याकडून ३०० रुपयांचा अंतिम दर जमा केल्याबद्दल ऊसउत्पादक शेतक-याकडून आनंद व्यक्त केला जात आहे. ३०० रूपये (तीनशे) प्रती मे. टन प्रमाणे होणारी रक्कम तत्परतेने संबंधित शेतक-यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याची माहिती रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांनी दिली आहे.