लातूर : लातूरचा शहरात आणखी एक नवा पॅटर्न सुरु होत असून कचरा वेचणा-या महिला आता पर्यावरण पूरक १०० ई – व्हेईकलच्या मालक आणि चालक होणार आहेत. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनिधिक स्वरूपात ई – व्हेईकलचे वाटप आय. आय. एम. जम्मू आणि डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक श्रीमती मेरी सगाया धनपाल यांच्या हस्ते करण्यात आले.
आजचा काळ जलद आहे, तुम्ही जेवढी जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा द्याल तर तुमच्या कार्याला मोल आहे. त्यामुळे दृष्टी बदलली, की दृष्टीकोन बदलेलं हे लक्षात ठेवून काम करा. तुम्ही आता पर्यावरण पूरक वाहनातून कचरा वेचणार आहात, त्याला आता हवा प्रदूषित करणारं डिझेल लागणार नसून एकदा बॅटरी चार्ज केली की १०० किलो मीटर चालणार आहे. त्यामुळे तुम्ही पर्यावरणाच्या रक्षक होणार आहात.. आजची सोनेरी सकाळ तुमचं भविष्य उज्वल करेल, अशी आशा पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी यावेळी बोलून दाखविली.
सफाई कर्मचारी उद्यमी अभियानांतर्गत एस. बी. आय. द्वारे महिला सफाई कामगार यांना ई- व्हेईकल वितरण व जिल्हा उद्योग केंद्र लातूर द्वारा मुख्यमंत्री रोजगार योजनेतील कार्यक्रम २०२२-२०२३ कार्यक्रम सोहळा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झाला. या कार्यक्रमास मनपा आयुक्त अमन मित्तल, मॅटोर डिक्की नेशनल वूमन विंग सीमा कांबळे, नांदेड उपविभागाचे अधीक्षकीय उद्योग अधिकारी नितीन कोळेकर, उप-महाव्यवस्थापक अकुला श्रीनिवास, जन-आधार संस्थाचे संजय कांबळे, मैत्रेय कांबळे, डीलर नंदकुमार बीजलगावकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हनबर, उमेदचे देवकुमार कांबळे, एलडीएम कसबे, उद्योजक आदीची उपस्थिती होती.