लातूर : प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भाव काळात फक्त काँग्रेस पक्षच रस्त्यावर उतरुन जनतेची मदत करत होता, नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे ते कार्य पक्षाच्या परंपरेला शोभणारे आणि कौतुकास्पद असेच होते, असे नमूद करुन समाजकारणासाठी राजकारण करणा-या काँग्रेस पक्षाला जनता कधीही विसरत नाही हे यावेळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आवर्जून सांगितले.
लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पुर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी काँग्रेस भवन येथे आयोजित प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, सचिव अभय साळुंके, श्रीपतराव काकडे, सर्जेराव मोरे, गणपतराव बाजुळगे, अनंतराव देशमुख, प्रमोद जाधव, रविंद्र काळे, नारायण लोखंडे, सुभाष घोडके, सुर्यशीला मोरे आदीसह काँग्रेस पक्षाचे आजी-माजी विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रत्येक निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
पूढे बोलतांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, येणारी प्रत्येक निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, प्रत्येक बूथ, वॉर्ड, गाव, मतदार संघ, काँग्रेस पक्षासाठी मताधिक्य देईल या पद्धतीने पक्ष बांधणी करावी, आपल्यावर असलेल्या जबाबदारीच्या मर्यादेत काटेकोर नियोजन करुन कामाला लागावे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विकासरत्न विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यरत आहोत. हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, हे स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकीत लातूरमधील काँग्रेसची ताकद देशाला व राज्याला दाखवून द्या. जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीवर काँग्रेस तिरंगा फडकवा, असे आवाहन करुन त्यासाठी आवश्यक असणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी दिले.
महाविकास आघाडी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवावी
मागच्या अडीच वर्षात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने अनेक चांगल्या योजना राबविल्या आहेत. अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. या महाविकास आघाडी माध्यमातून राबवलेल्या योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवावी. सामाजिक सौहदार्य तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखून जिल्ह्याचा समतोल विकास काँग्रेस पक्षाच करु शकतो हे जनतेला पटवून द्यावे, असे आवाहनही माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केले. कार्यकर्त्याने स्वत:ला उमेदवारी मिळणार आहे असे समजून कामाला लागावे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने स्वत:ला उमेदवारी मिळणार आहे, असे समजून कामाला लागावे, प्रत्यक्ष निवडणुकीत ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे सांगून ज्यांना संधी मिळाली नाही त्यांची विशेष दखल घेऊन इतर ठिकाणी त्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल अशी ग्वाही दिली, आमदार अमित देशमुख यांनी दिली.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन भाजपचे चुकीचे धोरण, महागाई व काँग्रेसने व महाविकास आघाडीने केलेली विकासकामे कार्यकर्त्यांनी घरोघर पोहोचवावीत, असे सांगितले तर लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी प्रास्ताविक करून जिल्ह्यात काँग्रेसने केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. या बैठकीचे सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले शेवटी आभार सरचिटणीस अमर खानापुरे यांनी मानले. यावेळी चाकूर तालुका अध्यक्ष विलास पाटील, अहमदपूर तालुका अध्यक्ष हेमंतराव पाटील, देवणीचे अध्यक्ष अजित बेळकूणे, आबासाहेब पाटील उजेडकर, धनंजय देशमुख, मारूती पांडे, दगडूसाहेब पडीले, सचिन दाताळ, बाबासाहेब गायकवाड, प्रवीण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर भिसे, पृथ्वीराज सिरसाट, चंद्रकांत मद्दे, प्रा.सुधीर पोतदार, प्रविण पाटील, शाम भोसले, मुन्ना पाटील, गोविंद बोराडे, राजकूमार पाटील, विजय निटूरे, शरद देशमुख, रमेश सुर्यवंशी, एकनाथ पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करुन आणला
यावेळी बोलताना आमदार धीरज विलासराव देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आदरणीय विलासराव देशमुख, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर, आदरणीय दिलीपराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे नेतृत्व, त्यांचा दूरदृष्टीपणा, त्यांचा सखोल अभ्यास यामुळे लातूर घडले असे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.
लातूरमध्ये शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करण्याबरोबरच कृषी, सहकार, आरोग्य, जलसंपदा अशा क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडला. जिल्हा बँक, बाजार समिती नावारुपाला आणली. इथल्या सर्वसामान्य, शेतकरी बांधवांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडली. हे सर्व काँग्रेसमुळे आणि आपल्याला लाभलेल्या नेतृत्वामुळे शक्य झाले. विकासाचा हा आलेख आपल्याला कायम ठेवायचा आहे असे म्हणाले. माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी अडीच वर्षाच्या काळात मविआ सरकारच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करुन आणला. लातूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात निधीचे समान वाटप केले. कोरोना काळात जिल्ह्यात आरोग्याच्या सोयी, सुविधा निर्माण केल्या. वैद्यकीय सामग्री व सुविधांचा तुटवडा पडू दिला नाही. त्यामुळे जिल्ह्यात मृत्युदर कमी राहिला. पूर-अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने दिली. सहकार, बँक आदीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास साधला. आपण आजवर केलेली लोकहिताची विविध विकासकामे आपल्याला लोकांपर्यंत घेवून जायची आहेत. या बळावर आगामी निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा आपण निर्धार करु, असे आवाहन यावेळी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.