शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून झालेल्या दमदार पावसाने शेतक-यांनी चाढ्यावर मुठ धरली असून आतापर्यंत सुमारे १६० हेक्टरवर पेरणी झाली असून हलक्या जमीनीवर पेरणी होत असली तरी नदीकाठचे शेतकरी अद्यापही पेरणी योग्य ओलावा झाला नसल्याने आणखी मोठ्या पावसाच्या प्रतक्षिेत आहेत.
तालुक्यात २८ हजार ५०० हेक्टर जमीन पेरणी योग्य असून यापैकी २७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक सुमारे २३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार आहे.४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर तुर, ५०० हेक्टरवर मुग ,१ हजार ५०० हेक्टर वर ज्वारीचा तर शिल्लक क्षेत्रावर इतर पिकांचा पेरा होणार आहे. दरम्यान रासायनिक खतांसह बियाणांचे वाढलेल्या दरामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तरीही या पावसाने पेरणीसाठीची लगबग सुरु झाली असून काळ्या आईची ओटी भरण्यासाठी कृषी केंद्रावर शेतक-याची बी-बियाणे व खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्राच्या दुकानात शेतक-यांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने ओढ दिल्यास दुबार पेरणीचा फटका बसू शकतो त्यामुळे शेतक-यांंनी शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.