लातूर : सोयाबीन पिकाचे उत्पन्न व उत्पादकता वाढविण्या बरोबरच मूल्य साखळी विकासासाठी व्यापक प्रयत्न व चर्चा होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री दादाजी भूसे यांच्या उपस्थितीत कृषी महाविद्यालय, लातूर येथे दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पिक असून सर्वात जास्त शेतकरी सोयाबीनचे पिक घेतात. राज्यात सर्वसाधारणपणे ४४ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जात असून प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा विभागाचे यात प्राबल्य आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे हे करणार असून वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परिषद होणार आहे.या परिषदेत राज्यमंत्री विश्वजीत कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, सचिव (कृषी) एकनाथ डवले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु अशोक ढवण व आयुक्त (कृषी) धीजरकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
सोयाबीन परिषदेमध्ये तज्ज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शास्त्रज्ञ, वायदेबाजार विश्लेशक व उद्योजक यांच्यामध्ये विविध विषयावर थेट परिसंवाद होणार असून या परिषदेमुळे सोयाबीन पिकाबाबत महाराष्ट्र शासनाचे भविष्यातील धोरण ठरविणे सुकर होणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाचे यूटयूब चैनल www.youtube.com/C/AgricultureDepartmentGoM तसेच जिल्हयाचे यूटयूब चैनल https://youtube.com/Channel/UCFg-YOgckp3SopZ8w9b7CGg वरून होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
या विषयांवर होणार मार्गदर्शन
या परिषदेमध्ये सोयाबीन पिकासाठी विकसीत अद्यावत उत्पादन तंत्रज्ञान, सोयाबीन पिकाशी निगडित यांत्रिकीकरण, सोयाबीन प्रक्रियामधील संघी व आव्हाने, विपनन व वायदे बाजार इ. बाबीवर अधिक उत्पादन घेणारे शेतकरी, उद्योजक, सोयाबीन व्यावसायातील तज्ज्ञ, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रतिनिधी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.
शिक्षण शुल्कात १५ टक्के कपातीचा शासन आदेश जारी