लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी व परिसरात काल सायंकाळी अवकाळी वादळी पाऊस होऊन फळबागा, भाजीपाला या शेती पिकांचे तसेच घरे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन आपदग्रस्तांना मदत करावी दिलासा द्यावा व नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
लातूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी पावसासंदर्भात माहिती मिळताच पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करुन तातडीने मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. औरादशहाजानी, हालसी, तगरखेडा, तसेच जिल्ह्यात इतर काही ठिकाणी वादळी वारे व पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. आंबा तसेच इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
विजेचे खांब वाकल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून मालमत्तेचे नुकसान झाल्यासंबंधीची प्राथमिक माहिती मिळाली असून जिल्ह्यात आणखी कुठे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्या संबंधी माहिती येऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी मदत पथके पाठवावीत. आपदग्रस्तांना मदत करावी व दिलासा द्यावा. त्याचबरोबर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडे अहवाल सादर करावा. महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवावी, असेही निर्देशही पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे दिले आहेत.