लातूर : जर तुमच्या अपार कष्टाची तयार असले तर गुणवत्तेला कोणत्याही भौतिक बाबी रोखू शकत नाहीत. हेच लातूर तालुक्यातील भिसे वाघोली येथील भगतसिंग विद्यालयातील श्रीराम कैलास लोखंडे या विद्यार्थ्याने सिद्ध करुन दाखवले आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत श्रीरामने ९७.२० टक्के गुण संपादन केले आहे. विशेष म्हणजे त्याने मजूरी करीत हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी त्याच्या घरी जाऊन त्याचा गौरव केला.
श्रीराम लोखंडेचे वडील सलुनचा व्यवसाय करतात. परंतु, त्यांना गेल्या काही वर्षांपासून पाठीच्य मनक्याचा आजार असल्यामुळे ते आता उभे राहून काम करु शकत नाहीत. जगायचे तर केवळ मजुरी हेच त्यांचे एकमेव साधन. मात्र आजारामुळे मजूरीही करता येत नाही. पाच पत्र्यांच्या एका खोलीत सारा संसार सामावलेला. आजारी वडील खोलीतील एका कोरप-यात पडलेले. आईच्या कष्टाला सीमा नाही, अशा प्रतिकुल परिस्थितीत श्रीराम स्वत: आईसोबत मजुरीने कामावर जात असे. आजही तो काबाडकष्ट करीतच आहे.
आजारी वडील आणि आईच्या कष्टाची सतत जाणिव असणा-या श्रीरामने मजूरी करीत असतानाच शिक्षणाकडेही तितकेच लक्ष दिले. दिवसभर मजूरी आणि रात्रीचा अभ्यास हा त्याचा नित्यक्रम ठरलेला होता. दहावीच्या परिक्षेत चांगले यश मिळवणे हे त्यांने आईच्या हातावरील कष्टाची फोडं पाहिली तेव्हाच ठरले होते. दहावीचा निकाल लागला आणि भगतसिंग विद्यालयातील श्रीराम लोखंडे याने चक्क ९७.२० टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातही बावण्णकशी सोने असते हेच सिद्ध करुन दाखवले.
श्रीराम लोखंडेच्या रुपाने ग्रामीण गुणवत्ता पुढे आली असून त्याचा गौरव सत्तार पटेल यांनी केला. यावेळी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष नवनाथ शिंदे, महादेवसर, पाखरेसर, ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढील प्रवेशासाठी मदत
श्रीराम लोखंडेने मिळवलेले यश भिसे वाघोलीत कौतूकाचा विषय ठरला आहे. आर्थिक अडचणीवर मात नव्हे पण त्यातून मार्ग काढून त्याने हे यश मिळावले आहे. अकारावीत प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यास एक हजार रुपयांची मदत तात्काळ देण्यात आली असून भविष्यातही आणखी मदत करण्यात येणार असल्याचे सत्तार पटेल यांनी सांगीतले.
Read More पानगावात एकाच दिवशी आढळले सहा कोरोनाबाधित