औसा :नैसर्गिक आपत्तीमुळे (एनडीआरएफ) अंतर्गत मदतीसाठी नुकसानीच्या घटकांमध्ये शंखी गोगलगायींचा समावेश करून पंचनामे व मदतीसाठी परिपत्रक काढण्याची मागणी शासनाकडे करणार असून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतक-याना त्या-त्या पध्दतीने कशी मदत मिळेल यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
दि. २९ जुलै रोजी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पीकाची पाहणी करून यासंदर्भात औसा येथे घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी व सरपंच उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा तालुक्यातील याकतपूर, जयनगर, किनीनवरे या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीने शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे तर आपचुंदा येथे ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणी दौ-यानंतर त्यांनी औसा येथील प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की. नैसर्गिक आपत्तीमुळे काही ठिकाणी संततधार पाऊस, गोगलगाय प्रादुर्भाव, ढगफुटी यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतक-यांंना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने जिथे ढगफुटी झाली आहे.
तिथे एनडीआरएफच्या माध्यमातून खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देता येईल. या अनुषंगाने खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिथे गोगलगायीचा प्रादुर्भाव नाही पण संततधार पावसाने पिके गेली आहेत तिथे संततधार पावसाच्या नुकसानीनुसार तर जिथे गोगलगाय प्रादुर्भावामुळे पिके गेली आहेत. तिथे वेगळा शासन आदेशाच्या मागणीवरून शेतक-यांंना नुकसान भरपाई देण्याची मागणी करू. याचबरोबर पीकविमा नियम आहे. यानुसार सध्याच पन्नास टक्के पीकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत. त्यामुळे संभाव्य नुकसान रक्कमेच्या पंचवीस टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याबाबत लातूरचे जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. गतवर्षीही आशाच प्रकारची मागणी केली होती.असे त्यांनी सांगितले. याचबरोबर आमदार अभिमन्यू पवार यांनी लवकरच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिं्ांदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पीकाची नुकसान भरपाई संदर्भाची मागणी करणार असल्याचे सांगितले. या आढावा बैठकीत ग्रामपंचायतने मनरेगा अंतर्गत योजनेचा समावेश कृती आराखड्यात करण्याच्या सूचना देऊन शेतरस्ते कामाचा आढावा घेतला.