नंदुरबार : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात मोठी घट झाली आहे. याचा फटका कापूस उत्पादक शेतक-यांना बसत आहे. त्यामुळे सरकारने कापूस उत्पादक शेतक-यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी नंदुरबार जिल्ह्यातील आम आदमी शेतकरी संघटनेने केली आहे. दर वाढत नसल्यानं शेतक-यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. शेतक-यांचा कापूस घरातच पडून आहे.
विदर्भनंतर राज्यातील सर्वात मोठा कापूस उत्पादक बेल्ट म्हणून उत्तर महाराष्ट्राची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्रात जवळपास १५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. लागवड जरी जास्त झाली असली तरी कापसाच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरीचिंतेत आहेत.
कापसाच्या दरात कधी वाढ होणार या प्रतिक्षेत राज्यातील शेतकरी आहेत. सध्या कापूस उत्पादनाचा खर्च मोठा वाढला आहे. कारण यावर्षी वाढलेल्या खतांच्या किंमती, बियाणांच्या किंमती तसेच रासायनिक औषधांच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढला असताना दुसरीकडे कापसाचे दर मात्र वाढत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे सध्या शेतक-यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. अशा स्थितीत सरकारने कापूस उत्पादक शेतक-यांना मदत करावी अशी मागणी आम आदमी शेतकरी संघटनेने केली आहे.
वस्त्रोद्योगालाही फटका बसण्याची शक्यता
पणन मंडळाने खुल्या बाजारात कापूस खरेदी केली पाहिजे अशी मागणी वाढत आहे. जिनिंग आणि सूत गिरण्यांना कापसाचा पुरवठा मागणीनुसार होत नसल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. वस्त्रोद्योगाला याचा फटका बसू शकतो.