मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे. विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. परवा दिवशी काही एसटी कर्मचा-यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. हातात दगड आणि चपला भिरकावत त्यांनी पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर कूच केली होती. एसटी कर्मचा-यांचे आंदोलन सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.
यातच आता शरद पवार यांच्या घरातील आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले, त्यांना सेवेत घेणार नाही, अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली. यासंदर्भात माहिती देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी येत्या २२ तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाचे आहेत. २२ तारखेपर्यंत जे कामगार रुजू होतील, त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. २२ तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाहीत, तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण करता येईल का, याचा विचार ही केला जाईल. ५ महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस आगाराने पूर्ण बसेसची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
गावदेवी पोलिस ठाण्यातील अधिका-यांची उचलबांगडी
या हल्ल्याच्या तपासादरम्यान काही वेगवान हालचाली घडत असताना आता गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजभर यांनाही हटवण्यात आले. या आधी या घटनेनंतर पोलिस उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांची बदली करण्यात आली होती. या मोर्चाची माहिती मीडियाला मिळाली. मात्र, पोलिसांना याची खबर का नव्हती, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला होता. दरम्यान, आज सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या दरम्यान संबंधित कारवाई झाली.