मुंबई : प्रतिनिधी
पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्यासंदर्भातील शासन निर्णयात शिक्षण विभागाने बदल केला आहे. आता इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. याआधी इयत्ता तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्यासंदर्भात शासन निर्णय मागील आठवड्यात जारी केला होता. याशिवाय पहिलीचे पुस्तकही चार विभागात विभागले जाणार आहे. यामध्येही काही वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने समाविष्ट करण्याची घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने मागील आठवड्यात घेतला. राज्य शासनाच्या सर्व शाळांत विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खासगी आणि बिनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. पाठ्यपुस्तकांना दिलेल्या प्रश्नपत्रिका सराव, वर्गपाठ गृहपाठ यांसाठी वेगळ््या वह्या ठेवण्यास परवानगी राहील. इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमधील कविता, धडा, घटक यानंतर विद्यार्थ्यांना नोंदी करता याव्यात, त्यासाठी पुस्तकांना वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. यामुळे पुस्तकाच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.