कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी लातूर जिल्ह्यातून आलेल्या चार महिला पंचगंगेत बुडत होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने हे संकट ओढवले होते. मात्र, जीवरक्षकांनी जीव धोक्यात घालून त्यांना तात्काळ वाचविले. त्यामुळे अनर्थ टळला. पोटात पाणी गेल्याने दोन महिला झाल्या अत्यवस्थ होत्या. परंतु त्यांना तात्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
या चार महिलांमध्ये माधुरी दत्ता अंबाडे (३५, रा. आरणी, जि. लातूर), कोमल सुरेश क्षीरसागर (४५), शामल राजकुमार क्षीरसागर (५०), मंगल सुरेश मगर (४५) यांचा समावेश आहे. जीवरक्षकांनी दाखवलेल्या धाडसाने या चारही मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्या. जीवरक्षक उदय निंबाळकरासह नागरिकांनी चारही महिलांना पाण्यातून बाहेर काढले. लातूर जिल्ह्यातील क्षीरसागर कुटुंबीय नातेवाईकांसह अंबाबाई दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये आले होते. त्यावेळी पंचगंगेत स्नान करण्यासाठी आले असता हा प्रकार घडला.
एकीला वाचवण्याच्या
नादात चौघी पाण्यात
नऊ जण आंघोळीसाठी पंचगंगेवर गेल्यानंतर माधुरी अन्य तीन महिलांसह स्रान करत असताना माधुरी यांचा पाय घसरुन खोल पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी कोमल पुढे गेल्या. त्या सुद्धा तोल जाऊन पाण्यात पडल्या. या दोघींना वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या शामल आणि मंगलही बुडू लागल्या. एकाचवेळी चार महिला बुडू लागल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर जीवरक्षक उदय निंबाळकर यांच्यासह विनायक जाधव तसेच अजिज शेख यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उड्या घेत सर्वांना वाचविले.