नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभोवतालचे वातावरण आणि माणसे लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. आमचा विठ्ठल चांगला आहे. मात्र त्याच्या अवतीभोवती असलेल्या चार-पाच बडव्यांनी त्यांना घेरले आहे. या बडव्यांमुळेच ‘मातोश्री’ बदनाम होत असल्याची टीका मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी माध्यमांशी बोलताना केली. मुंबईला जाण्यासाठी भुयार विमानतळावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक आहेत. मोर्शी या विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. सध्या सुरू असलेल्या सत्ता नाट्यात ते अजित पवार यांच्या सूचनेनुसारच तातडीने मुंबईला रवाना झाले. यावेळी अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, नाराज होऊन गेलेले आमदार याच कारणामुळे पक्ष सोडून गेले आहेत. काही बडवे मुख्यमंत्र्यांची भेट होऊ देत नाहीत. त्यांचा वेळ मिळू देत नाहीत. त्यामागचे प्रमुख कारण हे बडवे आहेत, असा आरोप भुयार यांनी केला.
नार्वेकर भेटू देत नाहीत…
हे बडवे नेमके कोण याबद्दल भुयार यांनी काही स्पष्ट केले नाही. मात्र, मिलिंद नार्वेकर यांची क्षमता काय, कौशल्य काय हे सर्वांना माहीत आहे. तेच आमदारांना आणि नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाहीत, असा थेट आरोप भुयार यांनी यावेळी केला.