मुंबई : अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी जलसंपदा आणि सिंचन विभागाबाबतही महत्त्वाच्या घोषणा केल्या. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याप्रकल्पांतर्गत १२ धरणांच्या बळकटीकरणासाठी ६२४ कोटी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटी मंजूर करण्यात आले आहेत. डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत हा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. राज्यात जलसंपदा विभागाची २७८ कामे सुरू आहेत. यातून २६ लाख ८८ हजार ५७६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यातून ८,४०० घनमीटर इतका पाणीसाठा निर्माण होणार आहे.
पंतप्रधान कृषिसिंचन योजनेंतर्गत २६ प्रकल्प
पंतप्रधान कृषिसिंचन योजनेंतर्गत २६ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची उर्वरीत किंमत २१,६९८ कोटी २१ लाख इतकी आहे. सन २०२१-२२ या वर्षात २६ पैकी १३ प्रकल्प पूर्ण करायचे सरकारचे उद्दीष्ट आहे असेही पवार यांनी सांगितले.
बळीराजा जलसंजीवनी योजनेतून ९१ प्रकल्प
बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत ९१ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पांची सुधारित किंमत १५,३२५ कोटी ६५ लाख इतकी आहे. ९१ पैकी १९ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून १,०२,७६९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे ५००० हेक्टर क्षेत्रात बंदनलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली.
ईस्टर्न फ्री वे ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव