कोल्हापूर : पंढरपूरला जाणा-या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी २ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपयांचा तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी ६ कोटी ७५ लाख २० हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशी निमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. आषाढी एकादशीच्या निमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून विविध संतांच्या पालख्यांसोबत मार्गक्रमण करणा-या वारक-यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी २ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
मागणी केल्याच्या ५० टक्के निधी दिला
पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या पन्नास टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे, असे मुश्रिफ म्हणाले.