मुंबई : विधानसभेचे अध्यक्षपद पटकावत शिंदे-भाजपा सरकारने सभागृहात देखील बहुमत सिद्ध केले. दरम्यान, बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
तथापि, आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरु झाली आहे. शिंदे गटाच्या बंडखोर ३९ आमदारांपैकी १५ जणांना मंत्रिपदे मिळणार आहेत.
दरम्यान, रविवारी झालेल्या सभापती निवडीच्या मतदानात राष्ट्रवादीचे पाच आमदार गैरहजर होते. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात मोठे वादळ येऊ शकते असे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी केवळ ४६ आमदारच सभापतीपदाच्या मतदानात भाग घेण्यासाठी विधानभवनात पोहोचू शकले. यातील नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत. तर, दत्तात्रेय भरणे, बबन शिंदे, नीलेश लंके, दिलीप मोहिते आणि अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे पाच आमदार मतदानात सहभागी झाले नव्हते. तसेच मनी लाँंिड्रगच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनीही मतदान केले नाही.
मतदान प्रक्रियेदरम्यान गैरहजर राहणारे यातील बहुतांश आमदार हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करायचा होता. अशातच काही आमदार मतदानाला उपस्थित न राहिल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
भरणे यांनी १ जुलै रोजी त्यांची आई गिरिजाबाई गमावल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. मोहिते आणि बनसोडे विधानभवनात उशिरा पोहोचल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ दिले नाही. लंके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अशी कारणे पाच आमदार गैरहजर असण्यामागे देण्यात आली.