मुंबई : ठाण्याचा व्यावसायिक आणि अँटिलियाजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सुमारे ४५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. तसेच आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ३० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपींनी हत्येसाठी ४५ लाखांची सुपारी दिली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन हा महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक झालेले आरोपी अत्यंत खतरनाक असल्याचे एनआयएचे वकील सुनील गोन्साल्विस यांनी सांगितले. ४ ते ५ साक्षीदारांना धमकी दिली गेली असल्याने ते पुढे येत नाहीत. कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, असा दावाही वकिलांनी केला.
९ जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली होती. एनआयएचे म्हणणे आहे की, या प्रकरणात पैसे कोणी दिले हे शोधण्याची गरज आहे. आतापर्यंत १५० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एका टीमने तपासासाठी दिल्लीला जाऊन काही लोकांची चौकशीही केली आहे.
परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांना लुकआऊट नोटीस
ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी २८ आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्याचे काम सुरू केले आहे. या गुन्ह्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचेही नाव आहे. केतन तन्ना यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. याशिवाय याआधीदेखील मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केलेली आहे. २८ जुलै रोजी जाहीर केलेल्या या नोटिशीमुळे परमबीर सिंग यांना आता परदेशात जाता येणार नाही. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर दिवसेंदिवस कारवाईचा फास आवळत चालला आहे. त्यांच्या विरोधात आतापर्यंत ठाणे आणि मुंबई परिसरात चार गुन्हे दाखल आहेत.
राज्यात पावसाची प्रतीक्षा, खरिपाची पिके माना टाकू लागली