मुंबई,दि.२१ (प्रतिनिधी) १० नवजात बालकांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशाला व्यथित करणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या चौकशी अहवालानंतर सरकारने कठोर कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना मेश्राम यांच्यासह तिघांना निलंबित करण्यात आले आहे. तर एक बालरोगतज्ज्ञ व दोन अधिपरिसेविका यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
भंडारा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल काल रात्री उशीरा आला. यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. आग लागलेल्या बिल्डिंगचे काम २०१५ साली झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने आगीचे ऑडिट करण्याची आवश्यकता असताना २०१६ साली घाईगडबडीने या इमारतीचे उदघाटन करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.चौकशी समितीच्या अभिप्रायानुसार एसएनसीयूमधील इलेक्ट्रीक सक्रीटमध्ये आग लागल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. या दुर्दैवी घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांना निलंबित, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिला बडे यांची अकार्यकारी पदावर बदली, वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची, परिसेविका ज्योती भारसकर यांच्यावर निलंबनाची तर कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्यावर सेवा समाप्तीची कंत्राटी बालरोग तज्ज्ञ डॉ.सुशिल अंबादे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
दरम्यान या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनाच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आरोग्यसंस्थांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना पत्र देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
लाखो रूपये किंमतीच्या सागवान झाडांची कत्तल