कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेत आज दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर टाहो मोर्चा काढला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारला काम करण्याची इच्छाच नाही, पूरग्रस्तांना पुरेशी मदत दिलीच नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
येत्या २ ते ३ दिवसांत प्रशासनाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून काय झाल्यास काय करणार आहात याची माहिती द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
गेल्यावर्षी ठाकरे सरकारकडून पूरग्रस्तांना तुटपुंजी मदत करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पूरग्रस्तांना तातडीने मदत केल्याचे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, २००५ नंतर प्रथमच २०१९ मध्ये महापुराचे संकट कोसळल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना नियोजन करून मदत केली होती. घराचे नुकसान झाल्यास ९५ हजार, घर दुरुस्तीसाठी ५० हजार, दुकानदारांना ५० हजार, रोज ६० रुपये प्रमाणे निर्वाहभत्ता दिला होता. कपडे आणि भांडी वाहून गेल्यानंतरही मदत केली होती. २०१९ च्या महापुरातून २०२१ च्या महापुरासाठी तयारी करायला हवी होती, पण ती झाली नाही. त्यावेळची मिळालेली मदत ही तुटपुंजी होती.
पूर आल्यास काहीच तयारी नाही
चंद्रकांत पाटील यांनी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन काहीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप केला. महामार्गावरील पूर टाळण्यासाठी ५ कोटींची गरज आहे, पण तेसुद्धा खर्च करण्याची यांची तयारी नसल्याचे ते म्हणाले. हे केल्यास महामार्गावरील पूरस्थिती टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.