नागपूर : मागील ब-याच दिवसांपासून देशभरात बर्ड फ्लूच्या संसर्गाने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात हा संसर्ग पाहिला गेला नाही. पण, कालांतराने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाच्या घटना पाहायला मिळाल्या. ज्यामुळे हजारो पक्षी मारण्यातही आले. एकिकडे पक्ष्यांंमध्ये अतिशय झपाट्याने पसरणा-या या संसर्गाची दहशत असतानाच दुसरीकडे चिकन आणि अंडी खाणा-यांनीही आता या गोष्टींकडे भीतीपोटी पाठ फिरवली आहे.
बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकन आणि अंडी खाण्याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. काहींनी तर या गोष्टी खाणे दूर त्यांच्याकडे पाहणेही सध्या बंदच केले आहे. पण, लोकांमधील हाच संभ्रम दूर करण्यासाठी नागपुरात एक शक्कल लढवण्यात आली. महाराष्ट्र पशुविज्ञान, मत्स्यपालन विद्यापीठात चक्क चिकन आणि अंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडला. यावेळी बर्ड फ्लूबाबत चुकीची माहिती पसरवणा-यांवर सरकार कठोर कारवाई करेल असा इशाराही केदार यांनी दिला. माणसाला बर्ड फ्लू झालेला दाखवल्यास रोख पारितोषिक देण्याच्या घोषणेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान, अंडी आणि चिकन महोत्सवात त्यापासून तयार केलेल्या विविध पदार्थांवर खवय्यांनी चांगलाच ताव मारला. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांनीही यानिमित्ताने रविवारचा पुरेपूर आस्वाद घेतला. खुद्द पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी स्वत: मात्र चिकन खाल्ले नाही. ते स्वत: शाकाहारी असल्यामुळे चिकन खात नसल्याचे त्यांनी अधिका-यांना सांगितले.
पेट्रोल-डिझेलमधून कमावलेले २० लाख कोटी कुठे गेले?