बुलडाणा : कत्तलीसाठी ट्रकमधून गायी घेऊन जात असल्याच्या संशयावरून जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना बुलडाण्यात घडली. नागरिकांनी ट्रकमधील गायी बाहेर काढून ट्रक पेटवला.
यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वर मध्यरात्री ही घटना घडली. मंगळवारी (३१ मे) रात्री एका ट्रकमधून कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याचे नागरिकांना दिसले. खामगावहून मध्य प्रदेशच्या दिशेने २५ गायी घेऊ जाणारा ट्रक नांदुरा शहरात बिघाड झाल्याने एका ठिकाणी थांबला.
मात्र त्यातील गायींचा ओरडण्याचा आवाज नागरिकांना आला. या ट्रकमध्ये २५ गायींना कोंबून भरले होते. नागरिकांनी त्यातील गायींना तात्काळ बाहेर काढले. पण त्यातील आठ गायींचा आधीच मृत्यू झालेला होता. काहींनी पोलिसांना फोन करून याची माहिती दिली.
दरम्यान नागरिकांचा संताप पाहून ट्रकचालक आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. मात्र नागरिकांच्या मनात संताप असल्याने त्यांनी तो ट्रक पेटवून दिला. यावेळी शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून चालक आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी उर्वरित गायींना गोरक्षण संस्थेकडे पशुचिकित्सकांच्या निगराणीखाली पाठवले आहे.