मुंबई : वादग्रस्त महिला पोलिस अधिकारी सुजाता पाटील पुन्हा सेवेत रुजू होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लाच घेतल्याप्रकरणी त्यांचे निलंबन झाले होते. अप्पर मुख्य सचिव गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर सेवेत पुन्हा सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलिस स्टेशनचा चार्ज होता. सुजाता पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आल्या होत्या. सुजाता पाटील यांनी हिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहून आत्महत्या आणि राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती.
महाविकास आघाडी सरकार असताना वादात अडकलेल्या चार अधिका-यांना शिंदे फडणवीस सरकारकडून क्लीन चीट दिली असल्याचे समोर आले आहे. नुकतेच या चारही अधिका-यांना पुन्हा सेवेत घेत असल्याबाबतचे शासन आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक पराग मणेरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांचा समावेश आहे.