मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे सण साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने यावेळी सर्व सण जल्लोषात साजरे केले जाणार आहेत. त्यासाठी यापूर्वीच राज्य सरकारने सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. दरम्यान, आता दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसे परिपत्रकदेखील काढण्यात आले आहे.
राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यासाठी राज्य सरकारने सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. सण साजरे करताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी योग्य ती खरबदारी घेण्याची सूचना राज्य सरकारने प्रशासनाला दिली. असे असताना दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. जारी केलेल्या परिपत्रकानुसार येत्या १९ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुटी असेल. मुंबईतील नियमावली राज्यभर लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच सांगितले आहे.