वाशिम : प्रतिनिधी
कधी लाथा तर कधी बुक्क्या, कधी पायताण तर कधी खुर्च्या… हे सगळे जगाला शांततेचा संदेश देणा-या भगवान पार्श्वनाथांच्या मंदिरासमोर सुरू होते. वाशिममधील तब्बल ४२ वर्षांनतर उघडलेल्या मंदिरातील भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीच्या लेपनावरुन वाद झाला आणि त्यानंतर दिगंबर आणि श्वेतांबर हे दोन पंथिय एकमेकांना भिडले. वाशिमच्या शिरपूर जैन या गावात भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीवरच्या लेपनावरून श्वेतांबर आणि दिगंबर पथियांमध्ये वाद सुरु झाला. श्वेतांबर पंथियांनी लेपनाच्या बहाण्याने मूर्तीचे रुपच बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप दिगंबर पंथियांनी केला. भगावन पार्श्वनाथांच्या मूर्तीच्या सुरक्षेसाठी श्वेतांबर पंथियांनी बाऊंसर लावले. वादाला तोंड फुटले आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. त्यात कुणाची डोकी फुटली तर कुणाची कंबरडी मोडली. अखेर श्वेतांबर पंथियांनी लेपन प्रक्रिया थांबवली.
मूर्तीच्या हक्कावरून वाद
दोन्ही पंथीयांमध्ये १२५ वर्षांपासून मूर्ती हक्कावरून वाद सुरू आहे. याच वादातून मंदिराला अखेर कुलुप लागले. त्यानंतर ४२ वर्षानंतर मंदिराचे दार उघडले. दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचे आणि मूर्तीला लेप करण्याचे कोर्टाने आदेश दिले. ११ मार्च रोजी श्वेतांबर पथांकडे मंदिराच्या चाव्या देण्यात आल्या. पण मूर्तीला लेपनचा अधिकार श्वेताबंर पंथियांना दिला होता. लेपन करण्यासाठी श्वेताबंर पंथियांनी कुलुप लावले. १४ मार्च रोजी दिगंबर पंथियांनी मंदिराचा दरवाजा उघडून प्रवेश मिळवला. मंदिराचा दरवाजा चुकीच्या पद्धतीने उघडल्याचा आरोप श्वेतांबर पंथियांनी केला. यातूनच वाद पेटला.