जळगाव : सध्या राजकारणात खोक्यावरून आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत मात्र आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहे, असे खळबळजनक विधान ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे. दरम्यान सद्यस्थितीत राजकारणात चांगल्या लोकांनी पडू नये अशी परिस्थिती झाली असून सर्वसामान्य माणसांना खोक्याची भाषा चालते का? असा सवालही भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला आहे.
दहा ते पंधरा टक्के लोकांचे व्यवस्थित चालले असून अनेकांना मात्र उद्या काय खावं याची काळजी असते. त्यामुळे अशा लोकांनी आता कोणाला निवडून द्यावे याचा विचार केला पाहिजे तरच या लोकशाहीचा उपयोग होईल असे देखील भालचंद्र नेमाडे जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
लोक जर असेच मूर्ख राहिले तर असलेच सरकार येत राहणार. राष्ट्रवादामुळे आपल्या देशाचे नुकसान होत आहे. पाकिस्तान, चीनमध्ये अत्यंत गरीब लोक असून पाकिस्तानात गरीब स्त्रिया लहान मुलांना हातात घेऊन कामाला जातात. युद्ध करायचे म्हणजे तुम्ही त्या स्त्रियांवर बॉम्ब टाकाल, असेही नेमाडे म्हणाले.
चिनी सरकार आपला शत्रू असेल पण चीन हा आपला शत्रू म्हणणे चुकीचे असून चिनी सैनिक आपल्याकडे येतात, मारामा-या करतात हे चुकीचे आहे. मात्र आपलेही सैनिक तेच करतात, असे वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी राष्ट्रवादावर बोलताना जळगावमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी केले आहे.