मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ मुंबईत आज काँग्रेस नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत राजभवनावर धडक दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस मोर्चा रोखण्यासाठी राजभवन परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे राजभवनाला छावणीचे स्वरुप आले होते. दरम्यान आंदोलनदरम्यान पोलिसांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, अशोक चव्हाण, अतुल लोंढे, अस्लम शेख, वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सोडले.
मुंबईत काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. हँगिंग गार्डन ते राजभवन अशा काँग्रेसच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य कॉंग्रेस नेते मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी देशव्यापी आंदोलन केले. राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते रस्त्यावर उतरले असून, गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आज आंदोलनकर्ते काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.
पोलिसांकडून मारहाण,राष्ट्रपतींकडे तक्रार करणार
राजधानी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाचा दरवाजा तोडून नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस केंद्राच्या इशा-यावर काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार आहेत.