बारामती : अरे बाबांनो, वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनो आज आपल्या राज्यात, देशात जे प्रश्न आहेत त्याला आपण महत्त्व देऊ, ते कसे सोडवता येतील ते पाहू. हे उगीच जुन्या कुठल्या विषयांमध्ये लोकांना घेऊन त्यांच्या भावना कशा भडकावता येतील, संभ्रमावस्था कशी निर्माण करता येईल हे पाहण्याचे काम नाही, प्रसारमाध्यमांनी देखील आता हे कमी करावे आणि विकासाच्या कामांना महत्त्व द्यावे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
बारामती येथे रविवारी (दि. १७) विविध विकासकामांच्या पाहणी दौ-यावर असणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, दिल्लीमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीमध्ये रात्री काही अपप्रकार घडले हे आपल्यासुद्धा पाहण्यात आले असतील. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आपापल्या सणांत आनंदाने, उत्साहाने सहभागी झाले पाहिजे. एकोप्याने राहिले पाहिजे. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये.
संविधानामुळेच आपला देश एकसंध असल्याचे आपल्याला पहावयास मिळते. आज आजूबाजूच्या देशांची काय अवस्था आहे.. असे असतानासुद्धा आपला एवढा मोठा खंडप्राय देश केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळे व संविधानामुळे एकसंध राहिला आहे. जेम्स लेनने नुकत्याच केलेल्या विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता ते म्हणाले, मी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. तुम्ही कारण नसताना माझ्या नावाने पावत्या फाडू नका. सध्याच्या विकासाच्या कामांना व राज्यासमोर, देशासमोर असणा-या प्रश्नांना महत्त्व द्या, असा सल्ला देखील दिला.