मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होत असून, कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्तींनाही मतदान करता येणार आहे. कोरोनाबधित व संशयितांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५डिसेंबर २०२० रोजी तपशीलवार मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यात आता मतदानाच्यादृष्टीने अधिक स्पष्टता आणली आहे. गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी तीनपर्यंत मतदानाची वेळ असेल.
मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा आणि साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत, असेही मदान यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक क्षेत्रामधील मतदारांची होणार दोनदा तपासणी
कोरोनाबाधित नसलेले, परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी साडेसातपासून मतदान करता येईल, असेही राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी स्पष्ट केले.
शेती व्यवसाय फायद्याचा ठरण्यासाठी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करावा