मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती, ही आमच्याकडून चूक झाली, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे जेष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिली.
कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागल्यामुळे वीज वितरण कंपनीने नंतर एकदम तीन महिन्याचे बिल पाठवले. एकत्रित बिल व कोरोनाकाळात झालेला विजेचा अतिरिक्त वापर यामुळे या बिलाचे आकडे सर्वसामान्यांना झटका देणारे होते. याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीपूर्वी वीजबिलात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु महाविजची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती व आधीच आर्थिक चणचण असलेल्या राज्य सरकारने सवलतीचा भार उचलण्यास नकार दिल्याने सवलत देने अजूनही शक्य झालेले नाही. यामुळे भाजप व मनसेने उग्र आंदोलन सुरू केले असून सरकारची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी सवलतीचे आश्वासन देण्याची चूक झाल्याची कबुली दिली आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. सवलतीसाठी खूप मोठा निधी लागेल. राऊत यांनी घोषणा करण्यापूर्वी मंत्रिमंडळात चर्चा करायला हवी होती. यामुळे विरोधकांना अकारण मुद्दा मिळाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !