नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राज्यातील पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेताना जातीपातीच्या राजकारणावरुन टीका केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये जात नसते. पण ज्याला निवडणुकीत उमेदवारी हवी असते, तिकीट हवे असते त्यांनाच जात आठवते, असा टोला नितीन गडकरींनी लगावला. तसेच लोक आपल्या सोयीसाठी जात पुढे करतात, मात्र त्यांनी जातीसाठी काय केले हा मोठा प्रश्नच असतो, असेही ते म्हणाले.
गडकरी म्हणाले, माणूस जातीने मोठा नसतो, कर्तृत्वाने मोठा असतो. भाजप जातीपातीचे राजकारण करत नाही. भाजपमध्ये सगळ्याच जातीचे कार्यकर्ते आहेत. मी अनेक जणांचे आॅपरेशन केले, त्यांना आरोग्याची सुविधा दिली. ही मदत करताना कुणाचीही जात विचारली जात नाही. कार्यकर्त्यांमध्ये जात नसते. ज्याला तिकीट पाहिजे असते त्यांना जात आठवते. आपल्या सोयीसाठी लोक जात पुढे करतात. मात्र, त्यांनी जातीसाठी काय केले हा मोठा प्रश्न असतो.
ज्यांनी मते दिली नाही त्यांच्यासाठी अधिक काम करा
नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना सांगितले, ज्यांनी मते दिली त्यांच्यासाठी तर काम कराच, पण ज्यांनी नाही दिली त्यांच्यासाठी सुद्धा चांगले काम करा. राजकारणात आमदार किंवा मंत्री बनण्यासाठी आलो नाही तर समाजाची सेवा करण्यासाठी आलो हे लक्षात ठेवले पाहिजे.
मिहानमध्ये ३७ हजार ६२० तरुणांना रोजगार
पदवीधरांच्या निवडणुकीत मी एकदा बिनविरोध निवडून आलो. या मतदारसंघाच्या माध्यमातून मला विदर्भाचे प्रश्न मांडता आले. मी विदर्भाच्या अनेक सिंचन प्रकल्पाचे मुद्दे अभ्यासले आणि ते मांडले. नागपूर इंटरनॅशनल विमानतळाचे टेंडर झाले होते़ मात्र सरकार बदलले आणि काम बंद झाले. मिहानच्या माध्यमातून मी अनेक कंपन्या आणल्या. त्यातून रोजगार निर्मिती होत आहे. मिहानमध्ये ३७ हजार ६२० तरुण मुलांना रोजगार मिळाला, असेही गडकरी यांनी नमूद केले.
धर्म बदलण्यासाठी त्रास दिला : कमालरुख खान