मुंबई : लवकरच नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होईल. अगदी पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून गणवेशापर्यंत सगळी खरेदीची धावपळ सुरू होईल. मात्र देशातील वाढत्या महागाईचा फटका आता शालेय जीवनावरही होणार आहे. महागाईचा परिणाम अभ्यासावरही होणार आहे. यावर्षी तुम्ही वह्या-पुस्तके खरेदी करायला जाताय तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.
आता शालेय साहित्याच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. वह्या आणि पुस्तकांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक खर्चाचा भार वाढणार असल्याचे चित्र आहे.
देशात सध्या महागाईचा भडका उडालेला दिसत आहे. एकीकडे भाज्या, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासह एलपीजी सिलिंडरचेही भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे आता या महागाईचा परिणाम शैक्षणिक पातळीवरही होणार आहे. वह्या, पुस्तकांच्या किमती वाढल्याने पालकांच्या अडचणी वाढणार आहेत. अवघ्या १५ दिवसांनंतर नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. मात्र यावर्षी तुम्ही वह्या-पुस्तके खरेदी करायला जाताय तर तुम्हाला खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे.
वह्या आणि पुस्तके तयार करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमती कोरोना काळात वाढल्याने तसेच कागदाचे प्रतिकिलो दर वाढले आहेत. कोरोनामुळे देशासह जगभरातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात वह्या आणि पुस्तके बनवण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे याचा भार आता शालेय जीवनावर पडणार आहे. शैक्षणिक वस्तू आणि साहित्याच्या दरावर जीएसटीही वाढवल्याने उत्पादकांना दर वाढवावे लागले आहेत. त्यामुळे याचा फटका वह्या आणि पुस्तकांच्या किमतींना बसणार आहे.