पालघर : पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे चिकन विक्रीची दुकाने आणि पोल्ट्री फार्म २१ दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याशिवाय, एक किलोमीटर परिसरातील चिकन विक्री दुकानांवरील कोंबड्या, अंडी, खाजगी पक्षी तसेच पशुखाद्याची विल्हेवाट लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पालघर शहरातील सूर्या कॉलनी येथील सरकारी पोल्ट्रीत अचानक ४५ कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बर्ड फ्लूने त्यांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले आहे.
या मृत कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. बर्ड फ्लू आढळल्यानंतर या सरकारी पोल्ट्रीमधील ५०० हून अधिक कोंबड्या आणि अंडी तसेच पशुखाद्य याची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली आहे.सूर्या कॉलनी येथील सरकारी पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरात खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्व चिकन विक्रीची दुकाने आणि पोल्ट्री फार्म बंद ठेवण्यात आली आहेत. या दुकानांतील कोंबड्या, अंडी, पशुखाद्य तसेच खाजगी पक्षी यांचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितले आहे. तसेच, जिल्ह्यात स्थापन केलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत इतर कुक्कुटपालन केंद्रांमध्ये व चिकन विक्री दुकानांमध्ये तपासणी करून खबरदारीच्या सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येत आहेत.
नियम सर्वाना सारखेच, पोहरादेवी येथील गर्दीबाबत तात्काळ कारवाई करावी