मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र जयंत पाटील यांनी या वक्तव्याबाबत ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारित केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्विट करत जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन एका पेपरमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये ही विनंती, असे त्यांनी म्हटले आहे.
मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण
व्हीडीओत बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की, दीर्घकाळ राजकारणात काम करणा-या कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यामुळे मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पण सध्याचे संख्याबळ लक्षात घेता ते आता शक्य नाही. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद आले नाही. जयंत पाटील पुढे म्हणाले होते की, राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ ५४ आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रिपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे.
जयंत पाटील यांच्या इच्छेला माझा पाठिंबा- उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली. जयंत पाटील यांच्या इच्छेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईत पत्रकारांनी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांच्या इच्छेला माझा पाठिंबा आहे, असं बोलकं उत्तर अजित पवार यांनी दिले़
डझनभर नेते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुमारे डझनभर नेते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे जयंत पाटील मुख्यमंत्री होतील का? याबाबत राजकीय निरीक्षकांच्या मनात साशंकता आहे. राष्ट्रवादीत अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे आदी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले अनेक चेहरे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदात अनेक अडथळे असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात.
२०२५ पर्यंत दरवर्षी टोल टॅक्समधून १.३४ लाख कोटी मिळतील