मुंबई,दि.१८ (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली ही एकच चूक आपण केली. अन्यथा भाजपाला स्वबळावर १५० प्लस जागा मिळाल्या असत्या असा दावा माजी मुख्यमंत्री व विधान विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग हे सज्जन व्यक्ती आहेत.मात्र त्यांच्या कार्यकाळातच देश रसातळाला गेला अशी टीकाही त्यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारा विरोधात लढाई सुरू केली.जुनी भ्रष्ट व्यवस्था मोडीत काढून नवीन व्यवस्था उभारली असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपाने आज व्हर्च्युअल सभा आयोजित केली होती. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , ज्येष्ठ नेते विनोद तावडे आदी मान्यवर या व्हर्च्युअल सभेला उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय चुकल्याचे शल्य व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी २०१३ मध्येच सांगितले होते की, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनविले तर २७२ हा संपूर्ण बहुमताचा आकडा भाजपा पार करेल. त्यावेळी भाऊ जरा जास्तच सांगत आहेत असे काहींना वाटले.पण ते सत्य झाले.२०१९ मध्येही देशात जरा अस्थिरतेचे वातावरण होते. बिहार, दिल्लीसारख्या निवडणूका हरलो होतो.पण त्यावेळीही भाऊंनी ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील असे भाकित केले व तेही खरे ठरले.विधानसभेच्या आधी देखील भाऊंनी पर्याय दिले होते.भाजपा स्वबळावर १५० प्लस व युती केली तर २०० प्लस. त्यावेळी आपण एकच चूक केली,युती केली.अन्यथा भाऊंचा हा पर्याय देखील खरा ठरला असता असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला.मोदींमध्ये स्वामी विवेकानंदांची झलक दिसते.योद्धा संन्यासी होउन ते जीवन जगत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू केली.ना खाउंगा ना खाने दूंगा हा मार्ग निवडला.मोदींनी दिल्लीतील भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान दिले.जुनी भ्रष्ट व्यवस्था मोडीत काढून नवीन व्यवस्था उभी केली. गरीब कल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा दिली , असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधींप्रमाणे सामान्यातल्या सामान्य माणसाला विश्वासात घेऊन जाण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीमुळेच कोरोना सारख्या संकटावर आपण मात करू शकलो. असे नेतृत्व मिळणे हे देशाचे भाग्यच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी शुक्रवारी केले. तोरसेकर यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्या स्वभावाचे , कार्यशैलीचे वेगवेगळे पदर उलगडून दाखविले. पंतप्रधानपदासारख्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्यावरही मोदी यांनी आपल्यातला स्वयंसेवक , कार्यकर्ता जपलेला आहे. आपल्या संघटनेची विचारधारा अंमलात आणण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती , संयम मोदींकडे असल्याने ३७० वे कलम रद्द करणे , तिहेरी तलाक रद्द करणे, रामजन्मभूमीवर मंदिर उभारणे या गोष्टी प्रत्यक्षात येऊ शकल्याचे मत तोरसेकर यांनी व्यक्त केले.आ.अतुल भातखळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.