मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शेती व पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करण्याबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी हितासाठी आपण कोणत्याही पक्षाचे असाल तरी एकत्र आलो पाहिजे. आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही पण या कायद्यांचे आंधळे समर्थन करायचे नसून कायद्यातील त्रुटी, उणीव दूर करणे महत्वाचे आहे. सर्वांना विश्वासात घेऊन व शेतकऱ्यांच्या संघटनांसोबत चर्चा होणे गरजेचे होते. विकास किंवा सुधारणांच्या आम्ही विरोधात नाही पण या अगोदरच्या शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीतल्या अनुभवांची देवाणघेवाण होणे गरजेचे होते असं सांगत त्यांनी कृषी विधेयकावरील आपली भूमिका स्पष्ट केली.
तसेच आपला देश हा जगातला सर्वात मोठा कृषिप्रधान देश आहे. आज आपल्याकडे हरित क्रांती झाली तरीदेखील शेतकरी आत्महत्या का होताहेत याचा विचार करायला हवा. अन्नदात्याला सुखी करायचे असेल तर कायद्यांमध्ये दर टप्प्याला काही आवश्यक सुधारणा करू शकतो का याचा विचार आवश्यक आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आज मांडलेल्या सूचना आणि मतांचा विचार करून निश्चितपणे एक आराखडा तयार केला जाईल व कायद्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले.
दिल्लीच्या गोलंदाजीमुळे बंगळूरू पराभूत