मुंबई : एमआयएमचे नेते अकबरोद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी शिवसेनेपासून ते विरोधी पक्ष असणा-या भाजपापर्यंत सर्वच प्रमुख पक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान असे असतानाच आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगजेबाचे हे थडगे उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे. राज्यामध्ये सत्तेत असणा-या महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असणा-या शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी मनसेने केली आहे.
मनसेने नेमके काय म्हटले आहे..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पक्षाची भूमिका मांडताना शिवसेनेला हिंदुत्ववादाच्या मुद्याचा संदर्भ देत हे थडगे उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे. १८ डिसेंबर २००० रोजी ‘सामना’मध्ये दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणतात, ‘‘संभाजीनगर येथे असलेलं हे औरंगजेबाचं थडगं जमीनदोस्त झालं पाहिजे. तसेच पुन्हा बांधता कामा नये.’’ ‘‘शिवसेनेचे हे सरकार आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहे का? हे थडगे जमीनदोस्त होणार आहे का?’’ असे प्रश्न मनसेने उपस्थित केले आहेत.
हे थडगे कशासाठी ठेवले?
तसेच पुढे बोलताना हे थडगे काय अकबरोद्दीन ओवेसींसारख्यांना नतमस्तक होण्यासाठी ठेवले आहे का, असा सवाल मनसेने थेट ओवेसींचा उल्लेख टाळत केला आहे. ‘‘या शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय आहे? ही निजामाची औलाद इथं येऊन या थडग्यावर नतमस्तक होणार. यासाठी हे थडगं ठेवलं आहे का?,’’ असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला.