अहमदनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ असे करावे ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर नगरमध्ये विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘अंबिकानगर’ या नावाची याआधीच मागणी करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या घोषणेची आठवण करून दिली आहे.
१९९५ मध्ये वाडिया पार्क येथे झालेल्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनीच अहमदनगरचे नाव अंबिकानगर केल्याची घोषणा केली होती, याची आठवण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी करून दिली आहे.
चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमावेळी गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी अडवले होते. त्यानंतर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर पडळकर यांनी हे सर्व संदर्भ देत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करावे, अशी मागणी केली. यावर आता मनसेचे वर्मा यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे.
सुमित वर्मा यांनी म्हटले आहे की, पडळकर यांना अचानक राजमातांनी केलेले कार्य आठवले. राजमाता अहिल्यादेवींचे कार्य धर्मासाठी मोठे आहे, त्यांना आम्ही वंदनच करतो. पण नगरकरांची अंबिकादेवीवरील श्रद्धा, आस्थाही लक्षात घ्यायला हवी. अहिल्यानगर या नावाची मागणी करताना आपण रिमोट कंट्रोलवर चालणारे आहात की स्वाभिमानी आहात? असा प्रश्न पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
मात्र, यापेक्षा मला हे विचारायचे आहे की मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या नावाची म्हणजे अहमदनगरचे अंबिकानगर या नावाची घोषणा केली होती. ती जबाबदारी पुढे घेऊन जाणार आहात की कुणाच्या मर्जीतील नावच रेटणार आहात? हेही आम्हाला पाहायचे आहे. १९९५ मध्ये वाडिया पार्क या ठिकाणी झालेल्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी अहमदनगरचे अंबिकानगर नाव केल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून आमच्या मनात हेच नाव आहे, असेही वर्मा म्हणाले.